माझा आवडता लेखक- पु. ल. देशपांडे
माझा आवडता लेखक- पु. ल. देशपांडे – Maja Aavadata lekhak pu.la.deshpande
वाचन हा माझा आवडता छंद आहे आणि काही पुस्तके तर माझी एवढी आवडती आहेत की, ती पुनःपुन्हा वाचली तरी मला त्यांचा कंटाळा येत नाही. उलट मुरलेल्या लोणच्याप्रमाणे त्यांची लज्जत वाढतच जाते. या अशा खास पुस्तकांत पु. ल. देशपांड यांची अनेक पुस्तके आहेत. काही मला बक्षीस मिळालेली, काही मी विकत घेतलेली. पण ही पुस्तके कितीदाही परत परत वाचली तरी त्यांची गोडी कमी होत नाही. कारण पु. ल. देशपांडे हे माझे आवडते लेखक आहेत. माझेच का? पु. ल. हे सान्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आहे.
अगदी सुरवातीला माझ्या वाचनात आले पु.लं.चे ‘खोगीरभरती’ आणि ‘नस्तो उठाठेव’ हे विनोदी लेखसंग्रह. काहीतरी वेगळंच आपण वाचत आहोत, असा मला अनुभव आला. हा काहीतरी वेगळाच लेखक आहे, हे जाणवत असतानाच, त्यांच्या ‘वयं मोठं खोटं’ या नाटुकलीत काम करण्याची मला संधी मिळाली आणि या लेखकाशी अधिक जवळिक झाली. या पुस्तकांबरोबर मोठे होत असतानाच मला कळलं की ज्या ‘नाच रे मोरा’ या गाण्यावर आपण नाचलो, त्या गाण्याची चाल पु.लं.नी दिलेली आहे आणि ‘गुळाचा गणपती’ हा चित्रपट तर ‘सबकुछ पुल’ आहे.
नंतर वाचनात आली पु.लं.ची ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि ‘गणगोत’ ही पुस्तके. तेव्हा लक्षात आले की हा लेखक केवळ विनोदीच लिहीत नाही, तर हा उत्कृष्ट व्यक्तिचित्रेही रेखाटतो. या व्यक्तिचित्रणांतून शाब्दिक कोट्या, प्रसंगाधिष्ठित विनोद आहे. पण त्याचबरोबर चिंतनाची झालर असलेले विनोदही जागोजागी आढळतात. त्यांचा विनोद हसवता हसवता अंतर्मुख करून जातो.
पु.लं.ची ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘अंमलदार’, ‘ती फुलराणी…’ ही नाटके पाहिली; पण ‘बटाट्याची चाळ’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘असा मी असामी’ हे एकपात्री प्रयोग पाहायची संधी मिळाली नाही, कारण पु.लं.नी ते प्रयोग आता थांबवले आहेत. मग त्या पुस्तकांची पारायणे केली. ‘बटाट्याच्या चाळी ‘ला जोडलेले ‘एक चिंतन’ हे पु.लं.च्या विनोदाचे खास उदाहरण म्हणून सांगता येईल. पु.लं.ची पुस्तके बाजूला ठेवली तरी त्यांच्या चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपला वा त्यांच्या नारायणची ‘नारायणगिरी’ विसरत नाही.
पु.लं.नी खूप प्रवास केला आणि तो अत्यंत मिस्किल, खुसखुशीत भाषेत शब्दरूपांतही आणला. अपूर्वाई, पूर्वरंग, वंगदेश ही पुस्तके मराठी साहित्यातील अजरामर स्थलवर्णने आहेत. पु.लं.नी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्या छोट्याशा प्रस्तावनाही आपल्याला एखादा मौल्यवान विचार देऊन जातात.
‘हास्य हे माणसामाणसाच्या मनात निर्भयता निर्माण करणारे मोठे साधन आहे. हास्य आणि सहानुभूती या दोन गोष्टी देऊन निसर्गाने माणसाला माणूसपण दिले आहे. खळाळून हसणाऱ्या मोठ्या समुदायातून या माणुसकीचे सर्वांत प्रभावी दर्शन होते.” असा हा माणुसकी गौरवणारा महाराष्ट्राचा महान अष्टपैलू लेखक माझा आवडता लेखक आहे.
———————————————————————————————————————————
मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो
Very nice information